सोमवार, २० मार्च, २०१७

स्मारकामुळे समृद्धी येत नाही



शरद जोशींच्या मला आवडलेल्या एका पुस्तकाचे  नाव आहे 'जग बदलणारी पुस्तके'. लोकसत्तेत या पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख आला होता. मूळात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जागतिकतेचे भान यावे, या उद्देशाने हे लेख आपल्या नियतकालिकातून जोशी यांनी लिहिले. आणि विशेष म्हणजे, शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण वर्गात येणाऱ्या प्रशिक्षणार्थीच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाल्याचे जोशी यांना आढळून आले. आणि म्हणूनच स्वातंत्र्य या संकल्पनेबाबत स्वारस्य असलेल्या सर्वानाच उपयुक्त ठरावे या हेतूने या लेखांचा पुस्तकरूपी संग्रह प्रसिद्ध करण्यात आला.
भारतातील शेतीचे दारिद्र्य समजण्यासाठी ही पुस्तके निदान शेतकऱ्यांच्या मुलांनी तरी अभ्यासली पाहिजेत. समाजवादाने आणि भ्रष्ट नौकरशाहीमुळे आपला देश सत्तर वर्षापूर्वी  'उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नौकरी' इथून सुरुवात करून आज 'उत्तम नौकरी, मध्यम व्यापार, कनिष्ट शेती' इथपर्यंत कसा आला हे त्यामुळे कोणालाही उमगेल. 'अजि म्यां ब्रह्म पहिले' हा पहिला लेख त्यांनी अमेरीकेतल्या एका छोट्या गावात असलेल्या पुस्तकाच्या दुकानाच्या भेटीवर लिहिला आहे. त्यात ते म्हणतात - "पंधरा हजार वस्तीच्या गावातील पुस्तकांचे एक दुकान आपल्याकडील विश्वविद्यालयाच्या ग्रंथालायापेक्षा मोठे असते, याचा मोठा अचंबा वाटत होता."



जगातील दहा मोठ्या वाचनालयाची माहिती देणारा हा विडीओ बघा.
भारतात असे एकही वाचनालय नाही. अशा वाचनालयांची यांची तीन चार शतकांची परंपरा आहे. आपल्या वाचनालयात पुस्तकांची पाने फाडून घेणे, पुस्तकात रेघा मारणे, लिहिणे, पुस्तके परत न करणे, पुस्तक लोकांना दाखवण्यासाठी घेऊन मिरवणे हे सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. 
आपली उपजीविका ज्या विषयातल्या ज्ञानावर आहे त्या विषयाची किंवा इतर कोणत्याही विषयाची मुळात आवड नसणे, आवडीच्या विषयातली चार चांगले लेखक माहित नसणे, त्यांची पुस्तके वाचलेली नसणे, त्यांनी नेमके काय लिहिले आहे माहित नसणे, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांचा घरी संग्रह नसणे अशी आपली 'मोले घातले वाचाया' अशी अवस्था आहे. 
घरात, गावात एका छानश्या लायब्ररीचे महत्व आपल्याला वाटत नाही. म्हणूनच मग स्मारक म्हटले की थोरामोठ्यांचे पुतळे उभारणे, उन्च पुतळ्यांची स्पर्धा लागणे या पलीकडे आपली कल्पना जाऊ शकत नाही. अशा स्मारकामुळे समृद्धी  येत नाही. समृद्ध समाजात आपोआप समृद्धीची  स्मारके निर्माण होतात. 


बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

अनंत कुलकर्णी यांचे फेसबुक वरील ब्लॉग्स.

मुद्दाम शोधून वाचावेत आणि डोक्यात घोळवत राहावेत असे काही ब्लॉग्स

ताई


तुम्ही धरण बांधायला काढलं. म्हटला आमचं गाव बुडणार. मग आमचं घरदार, जमिनी बुडवल्या नि एका गावच्या पाच पन्नास लोकांना अनोळखी उंबर्‍यांच्या पाच-पन्नास गावांत विखरून टाकलेत. तुटपुंज्या मोबदल्यासाठी आणि सुपीक जमिनीच्या बदल्यात मिळणारा वांझ जमिनीचा तुकडा पदरी पाडून घेण्यासाठी आयुष्यभराची वणवण पाठी लावली. धरणाच्या पाठीमागच्या टेकाडावार फार्म हाऊस बांधून काढणारे नक्की कुठून उगवले आम्हाला कळलंही नाही. आम्ही विचारलं, *'असं का?'*


*तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.*

काल एका मेडीकल स्टोअरवर औषधी घेण्यासाठी मी उभा होतो.
त्या बाबांची अडचण किती गंभीर होती व नड किती शुल्लक होती.
त्यांनी त्यावर संयमाने किती सहज मार्ग काढला.
परीस्थीतीचा बाऊ नाही, दुकानदारावर राग नाही,
व्यवस्थेविरुद्ध त्रागा नाही.
आहे ती परीस्थिती स्विकारुन बाबांनी आपले प्राधान्यक्रम ठरवले होते.
माय महत्वाचीच, पण त्या स्थितीत त्यांना लेकराची अधिक काळजी होती.

सेल्समन


तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत?


याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे.


पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते.


'गेट-टूगेदर'


यथाअवकाश भल्या मोठठ्या घरात आपण एकटच उराव
आणि रिकाम्या वेळी आठवणीनी 'गेट-टूगेदर'साठी चल म्हणाव!

पदराने ताटवाट्या पुसत स्वैपाकघरातून आई सर्वांना बोलवायची
"तू पण बस जेवायला" अस रोज एकदा तरी आजी तिला म्हणायची!


कधीकधी केराचा डबाही


कधीकधी केराचा डबाही,
मला मनापेक्षा बरा वाटतो.
दिवसातून एकदा का होईना,
निदान तो रिकामा तरी होतो..

आपण मात्र मनात किती,
दुःखद आठवणी साठवतो.
काय मिळवतो यातून आपण?
स्वतःचे दुःखच नुसते वाढवतो..

असे अनेक .....

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

जास्त दराचे प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये.

अत्यंत महत्वाची टिपणी. सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी ही विनंती.



आमचे मित्र अंकुशराव औटी पैठण तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी आहेत. गावाकडे चाललेले  व्यवहार पाहून त्यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.




५००/१००० रू.च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने युध्द पातळीवर काम करावे आणि जागरूक नागरिकांनी सामान्य जनतेसाठी काम करावे.काही व्यापारी याचा गैरफायदा घेण्याची दाट शक्यता आहे.कापूस ऊत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे.अनेक कापूस व्यापारी व खरेदीदार जून्या रद्द झालेल्या नोटा घेणार असाल तर जास्त दर देण्याचे प्रलोभन शेतकर्‍यांना दाखवत आहेत. किंबहूना रद्द झालेल्या नोटांसाठी आग्रही आहेत.अनेक शेतकरी यात बळी पडण्याची शक्यता आहे. काही शेतकरी या व्यापार्‍यांच्या जाळ्यात अडकले देखील आहेत.वास्तविक ही फसवणूकच आहे. सामान्य जनता, शेतमजूर,शेतकरी यांच्या मजबूरीचा फायदा घेण्यासाठी समाजातील काही घटक सक्रिय झाले आहेत. समाजातील काही अडाणी व अज्ञानी लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी जागरूक व जाणकार नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे.आतापर्यंत नागरिकांनी खूपच संयम दाखविला आहे तेव्हा शासनाने लोकांना त्वरित सर्व प्रकारच्या नवीन नोटा (१०,२०,५०,१००,५००,२०००) उपलब्ध करून द्यावात आणि नोटा बदली संबधात यापूढे मुदत वाढवू नये.

अंकुश औटी, औरंगाबाद.